पाठलाग भाग 1 (मराठी भयकथा )

 

पाठलाग भाग 1 (मराठी भयकथा ) मराठी थरारक कथा

सकाळ टळून आता उन्हाची किरणं तापायला लागली होती, धो धो कोसळणारा पाऊस थांबला होता. आसरी घाटातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग घाटातल्या त्या दाट झाडींमधून एखाद्या काळ्या चपळ सापासारखा धावत गेलेला दिसत होता. हिरव्यागार झाडींमध्ये आणि दोन्हीबाजूला लांबवर असलेल्या उंच उंच टेकड्या आणि हलक्या हलक्या धुक्यामुळे तो खूप मनमोहक भासू लागला. झाडांमधील पक्षी किलबिल करत या झाडांवरून त्या झाडांवर फिरत होते. याच सर्व मनमोहक वातावरणातून एक खाजगी बस महामार्गांवरुन धावत चालली होती.

बाहेरील घाटाचं वातावरण मनमोहक असलं तरी बसमधील वातावरण तसं नव्हतं. आकाश,जयेश, आणि आणि चंद्रकांत म्हणजेच चंदू हे तिघेही मित्र काहीसे भयभीत आणि चिंताग्रस्त अवस्थेत त्या बस मध्ये बसलेले होते. त्यांच्यासोबत त्या बसमध्ये अजून सहा बायका आणि तीन पुरुष होते सगळे तरुणच होते. पण भयभीत झालेले फक्त हे तिघेच होते .

"साला कुठून बुद्धी सुचली आणि ह्या आक्याच्या नादी लागलो आणि वाट लावून घेतली ", चंदू हळूच कुजबुजला.
"वाट लावून घेतली? नुसती वाट नाही लावली आता घरी जिवंत परत जाण्याची शक्यता नाहीये आपली." जयेश थोड्या मोठ्याने पण इतरांना ऐकू जाणार नाही अशा आवाजात बोलला.
इतक्यात मागून एका तरुणीचा लाडिक आवाज आला "काय रे जयेश काय झालं? काही बोललास का ? आम्हाला सांग ना"
जयेश गोंधळला, तो काही उत्तर द्यायच्या आधीच मागून सगळ्याच बायकांचा हसण्याचा आवाज आला. तो हसण्याचा आवाज लाडिक असला तरी तो जयेश आणि चंदूला भीतीदायकच वाटत होता.

आकाश, जयेश आणि चंदू तिघेही कॉलेजपासूनचे मित्र, कॉलेजमध्ये शिकत असताना जयेश आणि चंदू ची छान गट्टी जमली दोघेही एकमेकांना पूरक असे सरळमार्गी चालणारे, महत्वाकांक्षी मित्र होते आपण शिक्षण घेत आहोत ते काहीतरी चांगलं करण्यासाठी हे त्यांचं ध्येय होतं. कॉलेजच्या शेवटच्या दिवसांमध्ये आकाश सोबत त्यांची मैत्री झाली होती. एरवी त्यांना आकाश अजिबात आवडत नव्हता पण महत्वाकांक्षा हा एक गुण तिघांमध्ये समान होता आणि यामुळेच त्यांची तिघांची मैत्री झाली.
तिघांची जरी मैत्री झाली तरी जयेश आणि चंदूला पटण्यासारख्या खूप गोष्टी आकाशामध्ये होत्या. त्या त्यांना त्याच्या सोबत असतांना हळू हळू कळायला लागल्या होत्या. आकाश हा बाईलवेडा होता, त्यासाठी तो वय, नाते काही विचार करत नव्हता फक्त फ्लर्टींग करणं आणि कोणाला तरी गळाशी लावणं हे त्याच नियमित काम होतं. दिसायला फारसा देखणा नसूनही त्याच्या गोडगोड बोलण्याला मुली, बायका भुलायच्यात हे जयेश आणि चंदूला चांगलंच माहित होत. मैत्री सांभाळतांना आकाशच्या ह्या अवगुणांमध्ये जयेश अन चंदू दोघांनी कधी रस घेतला नाही आणि त्याला समर्थनदेखील केलं नाही.


कॉलेज संपवून आता वर्ष झाली चंदू आणि जयेश एकाच ठिकाणी नोकरीला लागले तर आकाश त्याच शहरात पण वेगळ्या ठिकाणी नोकरीला लागला.

एका रविवारच्या सकाळी जयेश आणि चंदू दोघेही मित्र खोलीवर उशिरापर्यंत झोपले होते, तोच जयेशचा फोन वाजायला लागला.
डोळे चोळत चोळत तो उठला आणि पाहिलं तर आकाशच फोन करत होता.
"हॅलो, बोल आकाश"
"अरे झोपेतच आहेत काय अजून उठा ना आता आठ वाजलेत", आकाश ओरडला.
"हो रे, आता उठतच होतो "
"बर ते जाऊदे मी काय म्हणतो ते ऐक, आम्ही एक ट्रिप प्लॅन केली आहे आत्ता nनिघायचंय रात्री तिकडेच थांबू उद्या दुपारपर्यंत परत येऊ"
"अरे पण उद्या सोमवार आहे ऑफिस... "
जयेश पूर्ण बोलणार तोवर अर्ध्यातच त्याला तोडत आकाश बोलला,
" वेडा झालास का ? उद्या सोमवार आहे पण , १५ ऑगस्ट आहे सुट्टी विसरलास का ?"
"अरे हो यार माझ्या लक्षातच नाही आलं, कुठे जाणार आहे ट्रिप तुमची ?"
"आमची नाही आपली म्हण, आणि चंदूला पण उठव लवकर आणि त्याला पण सांग "
"काय सांगू ?"
"अरे हि ट्रिप नुसती ट्रिप नाहीये तर धमाल आहे धमाल" आकाश मोठ्या उत्साहाने ओरडत बोलला.
जयेश ला प्रश्न पडला कारण आकाश ची धमाल म्हणजे काय त्याला चांगलंच माहित होतं.
"का मुली आहेत का कोणी ? सोबत " जयेश ने अडखळत विचारलं.
"हो सहा मुली आहेत आणि तीन मुलं माझ्या नवीन ऑफिस मधले" आकाश बोलला.
"नवीन ऑफिस ?"
"हो रे किती प्रश्न करतोय, चंदूला बोललो आह मी आधीच, आता आल्यावर सांगेल सगळं, लवकर या दोघे दहा वाजेपर्यंत गांधी चौकात, आम्ही बस केली आहे तिथेच तुम्हाला पिकअप करतो ." आकाश ओरडून बोलला.
"ओके आम्ही येतो " जयेश इतकंच बोलला .
तोपर्यंत आकाश ने फोन कट केला होता.
ह्या गडबडीत चंदू देखील झोपेतून उठला होता.
"काय रे आक्याचा फोन होता का ?" त्याने विचारलं.
"हो ट्रिप ला बोलावतोय कुठे काय काहीच माहित नाहीय" जयेश बोलला.

"अरे हा, परवा बोलला होता मला तो .."

"डुकऱ्या मग तू आत्ता सांगतो आहेस ? बरं जाऊदे ti ट्रिप कुठं जाणार आहे ?" जयेश बोलला.
" मला हि नाही माहित रे कुठे तरी लांब डोंगररांगात धबधब्या च्या आसपास फार्महाउस आहे आणि काय करायचंय माहित करून ट्रिप होण्याशी मतलब आहे आपल्याला" चंदू खुशीत ओरडला.
"अरे चंद्या पण ट्रिप मध्ये मुली आहेत सहा आणि त्या हि मुक्कामी थांबणार म्हणतोय तो, उद्या दुपारी शहरात परत येऊ असं बोललोय तो " जयेश हसत बोलला.
"अरे बाप रे मग तर ट्रिप ला जायलाच हवं, " चंदू बेडमधून उठत बोलला.
त्यासरशी दोघेही हसायला लागले.

जयेशने चंदूला एक हलकीशी लाथ मारली आणि म्हणाला,"आवर आता पटकन जायचंय ना ट्रिप ला ?"
"हो हो" म्हणत चंदू उठला आणि आवरायला लागला."


रविवार असल्याने गांधी चौक तसा शांतच होता, थोडीशी रहदारी चालू होती, काही मुलं उद्याच्या स्वातंत्र्य दिनासाठी गांधी पुतळ्याची साफ सफाई करत होते.

"यार दहा वाजेला बोलला होता हा आकाश,सव्वा दहा वाजलेत अजून त्यांचा यायचा पत्ता नाहीय",जयेश चिडून बोलला.
"ठीक आहे ना यार येईल, होतं थोडंफार लेट" चंदू त्याला समजावत होता.
"जर का याने साडे दहा वाजवले तर मी ट्रिप ला येणार नाही" जयेश ने घोषणा केली.
"पण अस होणार नाही कारण ती बघ समोरच्या बाजूला एक बस थांबलीये आणि आक्या हात करतोय" चंदू हसतच बोलला.

दोघेही आपापली पाठीवरची बॅग सावरत त्या बाजूला गेले आणि बसमध्ये चढताच बसमधल्या आधीच बसून आलेल्या तिघांनी त्यांचं स्वागत केलं. त्याबरोबर आकाश म्हणाला,
"अरे अजून सकाळचीच वेळ आहे चला सगळे इथलाच गांधी चौकातील फेमस चहा घेऊयात तोपर्यंत मुलीदेखील येतील".
त्याला सहमती दर्शवत सगळे चहा प्यायला रस्त्याच्या कडेला थांबले आणि इतक्यात आकाशच्या नवीन ऑफिस मधील सहा मुलीदेखील तिथे आल्या. चहा पीत असतांना आकाश ने त्याच्या नवीन ऑफिस मधल्या ट्रीपला आलेल्या तीन मुलं आणि सहा मुलींशी या दोघांची ओळख करून दिली. शेक हँड, हाय हॅलो झाल्यावर चहा पिऊन सगळे बसमध्ये चढायला लागले.
एका बाजूला मुली आणि एक बाजूला मुलं असे सगळे बसले खरे, पण ह्या दोघांच्या मनात प्रश्न पडला की जेमतेम बारा लोकांसाठी यांनी बस आणली? असं का केलं असेल.
चंदू लक्ष ड्रायव्हिंग सीट कडे गेलं तो ओरडलाच, "अय आकाश तू गाडी चालवणार आहेस ? कोणी ड्रायव्हर नाही आणला का ?"
"नाही रे यांनी गाडी मॅनेज केली मग मी।म्हटलं ड्रायव्हर साठी पैसे नाका घालवू मीच चालवेल बस"
तिकडून राकेश हसतच उत्तर दिलं आणि बस स्टार्ट केली. हा दोघांसाठी आश्चर्याचा दुसरा धक्का होता .

uगुरगुरतच बस गांधी चौक परिसरातून बाहेर पडली , हळू हळू ओळखी झाल्या मग सगळे गप्पांमध्ये रंगले.

एव्हाना पाऊसदेखील चालू झाला होता, पावसामुळे ट्रिप मध्ये मज्जा येईल या विचाराने सगळेजण आनंदले होते

फारशी वर्दळ नसल्याने अर्ध्या तासात ता बस शहराबाहेर निघाली होती.

गप्पांमधून जयेश अन चंदू ला कळलं कि राकेश नवीन ऑफिसला जॉईन होऊन आठ दहा दिवस झालेत आणि त्याच्या नवीन ऑफिस मधल्या नवीनच मित्र मैत्रिणींचा ग्रुप मिळून हि ट्रिप प्लॅन केली होती.

शहराचा कोलाहल मागे सोडून बस आता बऱ्यापैकी लांब आली होती.

क्रमशः

Comments

Popular posts from this blog

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ५

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ७